Skip to main content

कथा संग्रह

📄️श्री गणपतीची कहाणी

ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

📄️आदित्यराणूबाईची (पौष रवीवारची) कहाणी

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं." तेव्हा त्या म्हणाल्या, "श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यान (मुकाट्यान) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहाव, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळाखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण कराव. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहूण जेवू सांगाव. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव." असा वसा ब्राह्मणान केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावण धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीन सांगितलं, " भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या" "आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल." राणी म्हणाली, " दासी करीत नाही, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू."

📄️दिव्याच्या अवसेची कहाणी

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनीं रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली.

📄️गोपद्मांची कहाणी

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादि पाची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तोंच तुंबुर्‍याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मे-या फुटल्या. असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला, “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबुर्‍याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा.” असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव मनांत भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं तिला वसा सांगितला, ” सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून तीस दिवस तीन गोपद्मं देवाच्या द्वारी काढावीत, तितकीच ब्राह्मणाचे द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी.

📄️श्री हरतालिकेची कहाणी

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

📄️श्री ललितापंचमीची कहाणी

आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण होता. त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणींच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदानीं त्यांचं काय होतं नव्हतं तें सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जातां जातां एका नगरांत आलीं. दोन प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालतां चालतां दोघं दमून गेले आहेत, दोघांचे जीव भुकेनं कळवळले आहेत. दोघांचीं तोंडं सुकून गेलीं आहेत, असे ते दोघेजण त्या नगरींत आले. इतक्यांत एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरितां घरांतून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवूं घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनीं आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरीं ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवूं लागला. मुलंहि तिथं राहून वेद पढूं लागलीं. असं करतां करतां पुष्कळ दिवस झाले.

📄️मंगळागौरीची कहाणी

एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगि‍तली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल.

📄️श्री नागपंचमीची कथा

आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं ? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागीण तिथं आली.आपलं वारूळ पाहू लागली.तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला.तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली.ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली.

📄️श्री ऋषिपंचमीची कहाणी

ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई.

📄️श्री श्रावण सोमवार कहाणी

आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता, त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या एक नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगटं,नेसायला जाडें भरडे,राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावणमास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली, ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ वाहायला जात आहेत. नावडतीने विचारलं त्याने काय होतं ? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं,मुलबाळ होतं,नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण ? नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते.नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली.