Skip to main content

अध्याय पहिला

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगजाननाय नम:॥ आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणार्‍या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार्‍या सूतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्य लोकांत आले. आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दु:खे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दु:खे नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांंची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला.” नारद म्हणाले, “ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभ काळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दु:खे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो.” नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान विष्णु नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, “मुनिवरा,आपण कोणत्या कामासाठी आलात ? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन.” नारद म्हणाले, “हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दु:खे भॊगीत आहेत.” नारद म्हणाले, “हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दु:खे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऎकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, “हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दु:खे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. भगवान्‌ विष्णूंचे भाषण ऎकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, “हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा.” हे नारदाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत दु:ख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधू बांधवा समवेत सत्यनारायणा समोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दु:ख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे.” सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला.

shri satyanarayan katha adhyay 1