द्वादशोऽध्याय:
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी भगवंता ॥ पाळक नरहरीच्या सुता ॥ नरहरीरुपा कंदर्पताता ॥ अवतार अनंत मिरविशी ॥१॥
तरी आतां पुढें ग्रंथ ॥ बोलवीं बरवे रसभरित ॥ मागिले अध्यायीं मच्छिंद्रनाथ ॥ स्त्रीराज्यांत पै गेला ॥२॥
उपरी जालिंदराचा जन्म ॥ यज्ञकुंडीं उत्तमोत्तम ॥ उपरी पश्वात्तापेंकरुन ॥ पर्वतदरींत निघाला ॥३॥
तेथें प्रगटूनि ज्वाळामाळी ॥ तो परम स्नेहाचे नव्हाळीं ॥ अंकी घेऊनि त्या काळीं ॥ जन्मकथा सांगितली ॥४॥
आहे इतुकी कथा श्रोतीं ॥ पूर्वाअध्यायीं संपली होती ॥ आंता पुढें अवधानाप्रती ॥ श्रवणार्थी मिरवावें ॥५॥
असो महाराज द्विमूर्धनी ॥ सकळ जन्माची कथा सांगोनी ॥ उपरी बोले कामना मनीं ॥ कोणती बाळा ती सांग ॥६॥
येरु म्हणे जी महाराज ॥ कामनाविरहित मन माझें ॥ आहे परी हितार्थ गुज ॥ सकळ जाणसी तूं ताता ॥७॥
या नरदेहाची झाली प्राप्ती ॥ तरी सार्थक ओपीं माझें हातीं ॥ नाहीं तरी आले तैसे जाती ॥ ऐसें न करी महाराजा ॥८॥
जैसा उदककुंभ साचार येथें ॥ तो मळ उसके जेथें तेथें ॥ परी तयाचा विस्तार महीतें ॥ कांहीं एक मिरवेना ॥९॥
तरी व्यर्थ जन्मूनि मरण ॥ कीं लोहकाराचे भाते भरुन ॥ कीं भाडाईत ग्रंथिक रचून ॥ व्यर्थ शीण वृषभातें ॥१०॥
तरी आतां ऐक ताता ॥ मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता ॥ तिहीं भुवनांभाजी सत्ता ॥ चिरंजीवित्व संपादीं ॥११॥
लोक म्हणती जालिंदर झाला ॥ परी मेला नाहीं ऐकिला ॥ ऐसें न करुनियां देहाला ॥ जगीं मिरवी हे ताता ॥१२॥
ऐसें ऐकूनियां ज्वलन ॥ मौळी तुकावोनि डोलवी ॥ मान ॥ म्हणे बाळाचे धन्य ज्ञान ॥ वयासमान नसे कीं ॥१३॥