षष्ठोऽध्याय:
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी क्षीराब्धिवासा ॥ शेषशायी कमळहंसा ॥ नभोदभवशोभा कमळाभासा ॥ सुखविलासा रमेशा ॥१॥
हे करुणानिधे दयावंता ॥ दीनबंधो दीनानाथा ॥ पुढें रसाळ कवित्वकथा ॥ बोलवीं की रसनेसी ॥२॥
मागील अध्यायीं रसाळ कथन ॥ कीं बारामल्हार पवित्र स्थान ॥ तेथें अष्टदैवत पिशाच मिळोन ॥ युद्ध केलें नाथासी ॥३॥
यापरी बारामल्हार करुनि तीर्थ ॥ कुमार दैवत करुनि कोकणस्थानांत ॥ कुडाळ प्रांत आडूळ गांवांत ॥ येऊनियां राहिला ॥४॥
तों ग्रामाबाहेर दुर्गालयीं ॥ महाकाळिका दैवत आहे ॥ तयाचे दर्शना लवलाहें ॥ मच्छिंद्रनाथ पैं गेला ॥५॥
तें काळिकादैवत अति खडतर ॥ मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ॥ तें शिवहस्ताचें काळिकाअस्त्र ॥ स्थापन केलें महीसी ॥६॥
त्या अस्त्रेंकरुनि दैत्य वधिले ॥ म्हणोनि शिवचित्त प्रसन्न झाले ॥ म्हणूनि काळिकादेवी वहिलें ॥ वरदान घेई कां ॥७॥
वेधक कामना असेल चित्तीं ॥ तें वरप्रदान मागें भगवती ॥ येरी म्हणे अपर्णापती ॥ मम कामना ऐकिजे ॥८॥
तव हस्तीं मी बहुत दिवस ॥ बैसलें अस्त्रसंभारास ॥ आणि जेथें धाडिलें त्या कार्यास ॥ सिद्ध करुनि आलें मी ॥९॥
बहुत वृक्षांतें भंगितां क्षितीं ॥ मी श्रम पावलें अंबिकाहस्ती ॥ परी मातें विश्रांती ॥ सुखवासा भोगू दे ॥१०॥
मग अवश्य म्हणूनि उमारमण ॥ तेथें केलें तियेचें स्थापन ॥ तें उग्र दैवत अति म्हणोन ॥ अद्यापि आहे कलीमाजीं ॥११॥
त्या काळिकादर्शनासाठीं ॥ चित्त व्यग्र होवोनि पोटीं ॥ मार्ग लक्षूनि तयासाठीं ॥ संचार करिता जाहला ॥१२॥
देवीप्रती करुनि नमन ॥ म्हणे माय वो आश्वर्यपण ॥ म्यां मंत्रकाव्य केलें निपुण ॥ त्याजला साह्य होई तूं ॥१३॥
तरी माझें हस्तें विराजून ॥ मम कवित्वविद्या गौरवून ॥ तया ओपूनि वरदान ॥ कार्या उदित होई कां ॥१४॥
ऐसें मच्छिंद्र बोलतां वाणी ॥ क्षोभ चढला अंतःकरणीं ॥ शिवहस्तें अस्त्रालागोनि ॥ पूर्णाश्रम झालासे ॥१५॥
त्यात मच्छिंद्राचें बोलणें ॥ त्या काळिकादेवीनें ऐकून ॥ तेणें क्षोभलें अंतःकरण ॥ प्रळयासमान जेवीं ॥१६॥
जैसा मुचकंद श्रमोनि निद्रिस्त ॥ तैं काळयवन गेला तेथ ॥ निद्रा बिघडतां क्रोधानळांत ॥ प्रसर झाला त्या समयीं ॥१७॥
कीं प्रल्हाद पडतां परम संकटीं ॥ विष्णुहदयीं क्रोध दाटी ॥ प्रगट झाला कोरडे काष्ठी ॥ राक्षसालागीं निवटावया ॥१८॥
तैसी काळिकाहदयसरिता ॥ उचंबळली क्रोधभरिता ॥ मच्छिंद्रालागीं महीसिंधुअर्था ॥ मेळवूं पाहे लगबगें ॥१९॥
कीं क्रोध नोहे वडवानळ ॥ मच्छिंद्र अब्धी अपारजळ ॥ प्राशूं पाहे उतावळ ॥ अर्थसमय जाणूनियां ॥२०॥
म्हणे नष्टा अनिष्टा पतिता ॥ मी भवपाणी श्रमलें असतां ॥ त्यांतचि मातें दुःखवार्ता ॥ शिणवूं पाहसी पुढारा ॥२१॥
तुवां कवित्वविद्या निर्मून ॥ मातें मागसी वरप्रदान ॥ परी वर नोहे मजला विघ्न ॥ करुं आलासी दुर्बुद्धे ॥२२॥
अरे मी आपला भोग सारुन ॥ निवांत बैसलें सेवीत स्थान ॥ तैं तूं मातें वरा गोंवून ॥ शिणवूं पाहसी दुगत्मया ॥२३॥
तरी आतां मम लोचनीं ॥ उभा न राहें जाय फिरोनि ॥ नातरी आगळीक होतां करणी ॥ शासनकाळ लाभसील ॥२४॥
मी शिवकरीचे अस्त्र ॥ तव करीं राहीन काय विचित्र ॥ कीं करीं कवळूनि नरोटीपात्र ॥ भिक्षा मागे श्रीमंत ॥२५॥
किंवा पितळधातूची मुद्रिका रचिली ॥ ते हिराहिरकणी वेढका घडली ॥ तेवी तूतें कामना स्फुरली ॥ सर सर माघारा ॥२६॥
कीं वायसाचे धवळारी ॥ हंसबाळ करी चाकरी ॥ तन्न्यायें दुराचारी ॥ इच्छूं पाहे मम काष्ठा ॥२७॥
राव रंकाचे पंक्ती आला ॥ आला परी श्रेष्ठता त्याला ॥ कीं सिंधूचि कूपस्थानीं ठेला ॥ नांदत कीं आवडीनें ॥२८॥
की दीपतेजाते पाहूनि वास ॥ दीपतेजातें करी आस ॥ तन्न्यायें शक्तिअस्त्रास ॥ तंव करीं वसती प्रारब्धें ॥२९॥
आला विचारिता पांडित्यपण ॥ तो अजारक्षका पुसेल कोठून ॥ तन्न्यायें मूर्खा जाण ॥ आलासी येथें दुरात्मया ॥३०॥
अहा प्रतापी विनतासुत ॥ क्षीणचिलीट होऊनि मस्त ॥ तयासीं समता करुं पाहत ॥ तेवीं येथें आलासी ॥३१॥
अरे मी देव रुद्रकरी असतां ॥ तंव करीं वसूं हें काय भूता ॥ तूतें कांही शंका बोलतां ॥ वाटली नाहीं दुरात्मया ॥३२॥
तरी असो आतां कैसें ॥ येथोनि जाई लपवी मुखास ॥ नातरी जीवित्वा पावसी नाश ॥ पतंग दीपासम जेवीं ॥३३॥
याउपरी मच्छिंद्र म्हणे देवी ॥ पतंग जळे दीपासवीं ॥ परी तैसें नोहे माझे ठायीं ॥ प्रताप पाहीं तरी आतां ॥३४॥